कोथळीगड़ (पेठ चा किल्ला)


तसा मुंबई पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला हा छोटेखानी किल्ला नवोदित डोंगर भटकुंचा तसेच पारंगत गिर्यारोहकांचा ठेवणितला किल्ला!!
गिरिदुर्ग प्रकारात मोडणारा हा किल्ला कर्जत-भीमाशंकर या डोंगर रांगेत येतो. कर्जत पासून तासाभराच्या अंतरावर अंबिवली हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव.नेहमी ट्रेक्स ना जाताना दुरून खुणावणारा हा पाषाण पुरुष पाहण्याचा ठरला तो श्रावण महिन्यात, खरच कवीने म्हणले तसे चोहिकडे हिरवळ, झरे, पशु पक्षी आणि आमच्या सारखे काही उनाड भटके. सकाळी पाचच्या टोल्याला घर सोडले आणि दादरहुन लोकल पकडून कर्जतकड़े कुच केली, लोकलच्या गर्दीत शोधत येउन भेटत होते ते काही नविन सवंगडी, शेवटी कर्जत आले आणि तिथे आमचे पनवेलकर बस घेउन वाट पाहत होते, नाही नाही म्हणता आम्हा 30 जणांची टोळी अंबिवली गावत पोहोचली. घरून निघालेल्या रिकाम्या पोटात गरमा गरम मिसळ पाव आणि वाफाळलेला चहा जाताच सगळे तरतरित झाले. परंपरेनुसार ओळख परेड उरकली आणि पेठेच्या दिशेने पायपीट सुरु झाली. वाटेत जाताना कार्विचे फुललेले   रान, मधेच कुठून चाहुल देणारे पक्षी, मंद वाहणारे झरे आणि पावलागणित जवळ येणारा किल्ला.     
पेठ म्हणजे किल्ल्याच्या अगदी जवळचे गाव, इन मिन तीस-चाळीस मेहनती घरे आणि अशाच एका घराच्या आवारात एका तुटलेल्या तोफेचा भाग पाहिला. पुढे काही मिनिटांची उभी चढ़ाई आणि आम्ही पहिल्या भग्न प्रवेशद्वारातुन आत शिरतो तोच उजवीकडे एक बुरुज आणि सहा-सात फुटाची तोफ दिसते ती पाहून परत मागे आलो आणि समोर अनुक्रमे पिण्याच्या पाण्याचे टाके, देवीची गुहा आणि भैरोबाची गुहा लागते. पूर्णपणे कातळातुन कोरुन काढलेल्या या गुहेत चार कोरीव खांब आहेत. हे पाहून मार्गस्थ झालो ते उर्ध्वमुखी कोरुन काढलेल्या पायऱ्यांकडे, स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमूना डोळे दिपवणारा तसेच मनाची धडकी भरवणारा!
पायऱ्या चढून वर जाताना कळतही नाही की पोटात सुन्दर असा दरवाजा दडवलेला आहे, दरवाज्याच्या उजव्या बाजुस शरभ शिल्प आणि गजशिल्प पाहून गडमाथ्यावर प्रवेश केला. प्रवेशद्वारातून आत शिरताच वर छोटेसे तळे आहे, गडमाथा आटोपता असल्याने वर फार काही पाहण्यासारखे नाही पण वरून प्रबळगड, माथेरान, चंदेरी, सिद्धगड, माणिकगड, पदरगड, नागफणी असा प्रचंड मुलुख पाहता येतो. वरचे विलोभनीय दृश्य आणि वाऱ्याने थकवा उडवून लावला. पाउस आणि भूक यांनी भानावर आणले तसे आम्ही खाली गुहेकडे निघालो,

कलकलाट!!! अंदाजे शंभर एक चिल्लीपील्ली भैरोबाच्या गुहेत तळ ठोकून बसली होती, शेवटी आम्ही जागा मिळेल तशी कोणी एका कोपरयात कोणी देवीच्या गुहेत असे बसून सोबत आणलेल्या डब्यानवर तुटून पडलो, तृप्त पोटाने आणि मनाने सगळे किल्ला उतरायला लागले. घराची ओढ़! संध्याकाळचे पाच कधी वाजले कळालेच नाही, सांगता गरमागरम चहा ने करत बस पनवेलकडे रवाना झाली. मागे पाहिले तर कोथळीगड खुणावत होता पुढल्या भेटीसाठी... 






टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट